Businessआरोग्यराज्यलोकल न्यूज़

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलकडून १७५ हून अधिक एपिलेप्सी शस्त्रक्रिया पूर्ण 200 च्या ट्रॅकवर: मुलांमधील औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सीवरील भारतातील एकमेव आणि सर्वात मोठा समर्पित उपक्रम

क्यूरेटिव्ह शस्त्रक्रियेनंतर किमान एक वर्षाच्या फॉलो-अपमध्ये ८७ टक्‍के मुलांना आकडी येणे बंद झाले

POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 25/08/2026 📞  8850212023

 मुलांमधील गुंतागुंतीच्या औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सीसाठी बहुविद्याशाखीय काळजी आणि वैयक्तिक शस्त्रक्रिया पद्धती

मुंबई NHI24.COM: नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने मुलांमधील औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सीवरील (आकडी येणे) भारतातील एकमेव आणि देशातील सर्वात मोठ्या समर्पित उपक्रमाद्वारे १७५ हून अधिक एपिलेप्सी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या 200 च्या ट्रॅकवर पूर्ण केल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये क्युरेटिव्ह एपिलेप्सी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपैकी किमान एक वर्षाच्या फॉलो-अपनंतर ८७ टक्‍के मुलांना आकडी येणे बंद झाले आहे.
भारतातील उपचारांच्या मोठ्या गरजेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. भारतातील बाल आणि किशोरावस्थेतील लोकसंख्येपैकी अंदाजे ०.८ टक्‍के व्यक्तींना एपिलेप्सी आजार आहे. एपिलेप्सीने ग्रस्त असलेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये ही स्थिती बालपणातच विकसित होते. एपिलेप्सीग्रस्त मुलांपैकी सुमारे एक तृतीयांश मुलांना ड्रग-रेजिस्टंट एपिलेप्सी (औषधांना प्रतिसाद न देणारे एपिलेप्सी) असल्याचे स्पष्ट होते, ज्यांच्यासाठी विशेष औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सी केंद्रात वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात जवळपास २ ते ३ दशलक्ष व्यक्ती ड्रग-रेजिस्टंट एपिलेप्सीसह जगत आहेत, ज्यांपैकी सुमारे एक दशलक्ष व्यक्ती एपिलेप्सी शस्त्रक्रियेसाठी पात्र असू शकतात. तरीही, सध्या पात्र असलेल्या दर १,००० रुग्णांपैकी केवळ २ रुग्णांवर शस्त्रक्रिया होते, जी उपचारांमधील असलेली मोठी दरी दर्शवते.
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील एपिलेप्सी उपक्रम भारतातील चतुर्थ श्रेणीतील बालरोग न्यूरॉलॉजी उप-विशेषज्ञांचा विस्तार करण्याच्या ध्येयाने न्यूरोसायन्सेस विभागाच्या प्रमुख डॉ. अनायता उदवाडिया हेगडे, पीडियाट्रिक न्यूरॉलॉजीच्या सीनियर कंसल्टण्ट डॉ. प्रज्ञा गाडगीळ आणि सीनियर कंसल्टण्ट पीडियाट्रिक न्यूरोसर्जन डॉ. सौरव सामंतराय या डॉक्टरांच्या समर्पित टीमद्वारे सुरू करण्यात आला होता.
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागाच्या प्रमुख डॉ. अनायता उदवाडिया हेगडे म्हणाल्या, “भारतात सर्वसमावेशक तृतीयक बालरोग न्यूरोसायन्स सेवांची गरज यापूर्वी कधीही नव्हती इतकी वाढली आहे. लहान मुलांमधील न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये एपिलेप्सी हा सर्वात जास्त आढळणारा आजार आहे, तरीही विशेष उपचारांची उपलब्धता मर्यादित आहे. समर्पित टीम आणि पायाभूत सुविधांच्या पाठिंब्याशिवाय गुंतागुंतीचे न्यूरॉलॉजी उपचार प्रभावीपणे दिले जाऊ शकत नाहीत. यासाठी प्रबळ संस्थात्मक उपक्रमांची गरज असते, जिथे बहुविद्याशाखीय टीम्स विशेष पायाभूत सुविधा आणि प्रोटोकॉल-आधारित व्यवस्थापनाच्या कार्यसंस्कृतीच्या आधारे एकत्र काम करतात.”
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्स पेडियाट्रिक एपिलेप्सी प्रोग्रामच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा गाडगीळ म्हणाल्या, “अनियंत्रित बालरोग एपिलेप्सी ही अतिशय कठीण परिस्थिती असते. वारंवार आणि अचानक येणाऱ्या आकडीव्यतिरिक्त यामुळे जीवन आणि शरीराला मोठा धोका निर्माण होतो. सततचा अनियंत्रित एपिलेप्सी आणि आकडी येणे कमी करण्यासाठी दिली जाणारी अनेक औषधे यांमुळे मज्जासंस्थेच्या विकासावरही मोठा परिणाम होतो. अशा मुलांवर बऱ्याचदा शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य असतात, जिथे शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे आकडी-मुक्त होण्याची शक्यता असते. अचूक प्री-सर्जिकल मूल्यमापनाद्वारे अशा मुलांची वेळेवर ओळख पटवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर मुलांना डिसीज-मॉडिफायिंग एपिलेप्सी शस्त्रक्रियांचा फायदा होऊ शकतो.”
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे पीडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे सीनियर कंसल्टण्ट डॉ. सौरव सामंतराय म्हणाले, “एपिलेप्सी शस्त्रक्रिया म्हणजे अत्यंत विशिष्ट न्यूरोसर्जिकल प्रक्रियांचा समूह आहे, ज्या प्रत्येक मुलासाठी वैयक्तिकरित्या निवडल्या जातात. काही प्रक्रियांचा उद्देश आकडी येण्यासाठी कारणीभूत असलेल्या उती काढून टाकणे, त्यांचा संपर्क तोडणे किंवा मिनिमली इनव्हेसिव्ह पद्धतीने त्या काढून आकडी बंद करणे हा असतो, तर इतरांचा उद्देश पूर्ण उपचार अशक्य असल्यास आकडीची गंभीर तीव्रता कमी करणे हा असतो. योग्यरित्या निवडलेल्या मुलांमध्ये याचे फायदे केवळ आकडी नियंत्रणात आणण्यापुरते मर्यादित राहत नाहीत. एपिलेप्सी पूर्ण बरा होतो किंवा चांगल्या प्रकारे नियंत्रणात येतो, तेव्हा बऱ्याचदा न्यूरोकॉग्निटिव्ह कार्यक्षमतेत सुधारणा होते. त्यामुळे एपिलेप्सी शस्त्रक्रियेचे फायदे केवळ आकडी नियंत्रणात आणण्यापलीकडे जातात. हे परिणाम केवळ एका वैयक्तिक न्यूरोसर्जनद्वारे नाही, तर अनुभवी बहुविद्याशाखीय एपिलेप्सी टीमद्वारे साध्य केले जाऊ शकतात.”
या उपक्रमातील खालील केसेस वेळेवर केलेल्या शस्त्रक्रिया मूल्यांकन आणि उपचारांमुळे काय साध्य होऊ शकते हे स्पष्ट करतात:
रोहन (नाव बदलले आहे) या सहा वर्षांच्या मुलाला दोन वर्षांचा असताना दररोज ड्रॉप अटॅक्स (अचानक चक्कर येऊन पडणे) येऊ लागले होते. पुढील दोन ते तीन वर्षांत त्याची वाचण्याची, लिहिण्याची आणि इतर मुलांशी संवाद साधण्याची क्षमता कमी झाली. अनेक औषधे देऊनही त्याचे ड्रॉप अटॅक्स नियंत्रणात न आल्यामुळे त्याच्यावर कॉर्पस कॅलोसोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी त्याचे ड्रॉप अटॅक्स पूर्णपणे थांबले. पुढील काही महिन्यांत, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या मदतीने त्याने पुन्हा कविता म्हणणे आणि अक्षरे व अंक लिहिणे सुरू केले.
प्रतीक (नाव बदलले आहे), जो आता विशीत आहे, वयाच्या साडेतीन वर्षांपासून रात्रीच्या वेळी येणाऱ्या तीव्र आकडीचा सामना करत होता. विविध केंद्रांमध्ये तपासण्या करूनही तब्बल २३ वर्षे या त्रासामुळे तो आणि त्याचे कुटुंब रात्रभर जागे राहत असे. एसआरसीसीमधील नवीन मूल्यांकनात त्याच्या मज्जासंस्थेतील जन्मतः असलेला दोष समोर आला, जो दोन दशकांहून अधिक काळ इतरत्र लक्षात आला नव्हता. हा दोष काढून टाकण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पहिल्याच रात्रीपासून त्याला एकही आकडी आली नाही. जवळपास सहा महिने उलटूनही त्याला आकडी आलेली नाही आणि पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.
रत्नागिरीतील १० वर्षांची मुलगी मिथिला (नाव बदलले आहे) हिला जन्मापूर्वी झालेल्या मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळे बालपणापासून रोज आकडी येत होती. इतर केंद्रांनी तिच्यावर फारसे काही उपचार होऊ शकत नाहीत असे सांगितले होते. विद्यमान उजव्या बाजूच्या अशक्तपणाची समस्या अधिक वाढण्याचा धोका असतानाही तिच्यावर हेमिस्फेरेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्याद्वारे मेंदूचा दुखापत झालेला अर्धा भाग सुदृढ भागापासून वेगळा करण्यात आला. तीन महिन्यांनंतर तिला आकडी येणे बंद झाले आहे आणि पुनर्वसनाच्या मदतीने स्वतःच्या पायावर चालत आहे व आयुष्यात पहिल्यांदाच बोलू लागली आहे.
राज (नाव बदलले आहे), वय १२ वर्षे, याला जन्माच्या वेळी मेंदूला दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याच्या शारीरिक व मानसिक विकासावर याचा परिणाम झाला नाही, वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत तो अगदी फुटबॉलही खेळत होता. पण, वाढत जाणारे झटके आणि ईईजीच्या ढासळण्यामुळे तो अंथरुणाला खिळला आणि त्याची बोलण्याची क्षमताही गेली. उपचाराच्या पर्यायांबद्दल पुरेशी जागरूकता नसल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया तब्बल एक वर्ष लांबणीवर पडली. कॉर्पस कॅलोसोटोमी शस्त्रक्रियेनंतर त्याचे ड्रॉप अटॅक्स पूर्णपणे थांबले. सहा महिन्यांनंतर तो स्वतःच्या पायावर चालत आहे आणि बोलू लागला आहे.
सोनम (नाव बदलले आहे), ही साडेपाच वर्षांची मुलगी दुर्मिळ हायपोथॅलॅमिक हॅमार्टोमामुळे दररोज ‘हसण्याचे झटके’ सहन करत होती. हा मेंदूच्या अतिशय खोल भागात असलेला दोष असल्याने पारंपारिक ओपन न्यूरोसर्जिकल पद्धतीने तिथे पोहोचल्यास गंभीर गुंतागुंत होण्याचा मोठा धोका होता. तिच्यावर स्टिरिओटॅक्टिक रेडिओफ्रीक्वन्सी अब्लेशन ही मिनिमली इनव्हेसिव्ह (किमान शस्त्रक्रिया असणारी) प्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच ती कोणतीही गुंतागुंत न होता पूर्ण शुद्धीवर आली आणि अन्न सेवन करू लागली. तिचे झटके पूर्णपणे थांबले आहेत.
साडेतीन वर्षांत १७५ हून अधिक पीडियाट्रिक एपिलेप्सी शस्त्रक्रियांचा अनुभव एका सोप्या संदेशाला दुजोरा देतो: औषधे देऊनही मुलाला सतत आकडी येत असेल, तर एपिलेप्सी हा आजार लपवून न ठेवता त्यावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. भारतातील फार कमी केंद्रांमध्ये मुलांमधील ड्रग-रेजिस्टंट एपिलेप्सीवर उपचार केले जातात. अशा अत्यंत विशिष्ट क्षेत्रात या उपक्रमातील यश हे गुंतागुंतीच्या केसेसमधील मोठ्या अनुभवाचे प्रतीक आहे. वेळेवर घेतलेली दखल, योग्य केंद्राकडे केलेले संदर्भ आणि विशेष उपचारांची उपलब्धता यामुळे वर्षानुवर्षे अनियंत्रित राहणारी आकडी रोखून मुलाला पुन्हा शिक्षण, विकास आणि सामान्य आयुष्याकडे आणता येऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!