डिजिटल भारताला सुरक्षित करणारी नवी पिढी तयार; आयआयटी बॉम्बेतील कॅप्चर द फ्लॅग स्पर्धेचा समारोप
डिजिटल भारताला सुरक्षित करणारी नवी पिढी तयार

POSTED BY : ANAGHA SAKPAL DT.15/12/2025 📞 9004379946

मुंबई,( NHI@24.COM) : : सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात देशातील तरुण प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि या क्षेत्रातील वाढत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी, आयआयटी बॉम्बेच्या ‘ट्रस्ट लॅब’ ने आज राष्ट्रीय स्तरावरील ‘कॅप्चर द फ्लॅग’ स्पर्धेचा भव्य समारोप केला. देशभरातील ४८० टीम्समधून निवडलेल्या अव्वल ५० फायनलिस्ट टीम्सनी आयआयटी पवई कॅम्पसमध्ये झालेल्या या अंतिम फेरीत भाग घेतला. डिजिटल धोक्यांना तोंड देण्यासाठी तयारी भारताचे डिजिटल पाऊल वेगाने वाढत असताना, सायबर सुरक्षेच्या नोकऱ्यांमध्ये तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आहे. ही मोठी कौशल्य कमतरता भरून काढण्यासाठीच आयआयटी बॉम्बेने हा उपक्रम आयोजित केला होता.
या स्पर्धेत सहभागींना क्रिप्टोग्राफी, रिव्हर्स इंजिनियरिंग, वेब सुरक्षा आणि फॉरेन्सिक्स अशा वास्तविक जगातील डिजिटल धोकादायक परिस्थितींवर आधारित आव्हाने सोडवावी लागली. या स्पर्धांमुळे सायबर घोटाळे, आर्थिक फसवणूक, फिशिंग आणि रॅन्समवेअर यांसारख्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक कौशल्य मिळाले.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी याप्रसंगी सांगितले की, “ऑनलाइन घोटाळे, आर्थिक फसवणूक, फिशिंग आणि रॅन्समवेअर यांसारख्या डिजिटल धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’, ‘क्रिप्टोग्राफी’ आणि ‘अप्लिकेशन सिक्युरिटी’ सारखे कौशल्ये निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा जागतिक स्तरावर सर्वात प्रभावी मानल्या जातात.”
ते पुढे म्हणाले, “युपीआय, फिनटेक ते स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआय-शक्तीवर चालणाऱ्या सेवांपर्यंत भारताचे डिजिटल पाऊल वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिकांची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. ‘ट्रस्ट लॅब’ याच प्रतिभेला वाव देण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या स्पर्धेत आयआयटी रुरकीच्या ‘जिंगर्स’ टीमने बाजी मारली. विशेष उल्लेख म्हणून, श्रियांश गुप्ता या ११वीच्या विद्यार्थ्याने अंडरग्रेजुएट विद्यार्थ्यांच्या तुलनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याची प्रशंसा करण्यात आली.




