डीएसटी–फिक्की कार्यशाळेत “राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वेक्षण 2024–25” द्वारे भारताच्या आरअँडडी आणि नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देण्यावर भर
भारताच्या आरअँडडी आणि नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देण्यावर भर
POSTED BY: ANAGHA SAKPAL, 08 NOVEMBER 2025 📞 9004379946

मुंबई,(NHI@) : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी), फिक्की (FICCI) च्या सहकार्याने राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) सर्वेक्षण 2024–25 विषयावर कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे केले. या कार्यशाळेत उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि विविध सरकारी प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश सर्वेक्षणात उद्योग व शैक्षणिक क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि भारतात एक सशक्त, माहितीआधारित नवोपक्रम परिसंस्था उभारण्याचे मार्ग निश्चित करणे हा होता.
राष्ट्रीय S&T सर्वेक्षण, डीएसटीद्वारे राबविण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी भारतातील संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्राचे वास्तव चित्र सादर करते. या सर्वेक्षणातून आरअँडडी गुंतवणूक, मानवी संसाधन क्षमता आणि विविध क्षेत्रांतील नवोपक्रम परिणामांविषयी सखोल माहिती मिळते.
प्रा. अभय करंदीकर, सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भारत सरकार यांनी आपल्या भाषणात म्हटले, “भारताच्या ‘विकसित भारत’ या दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी संशोधन आणि नवोपक्रम हे आपल्या विकासकथेत केंद्रस्थानी आले पाहिजे, केवळ विद्यापीठे आणि प्रयोगशाळांपुरते नव्हे, तर उद्योग आणि स्टार्टअप्समध्येदेखील. राष्ट्रीय S&T सर्वेक्षण हे तथ्याधारित धोरणनिर्मितीसाठी भक्कम पाया निर्माण करते, ज्यामुळे नवोपक्रमावर आधारित विकासाला गती मिळेल.”
प्रा. करंदीकर यांनी पुढे सांगितले की, या सर्वेक्षणातून मिळणारे अचूक डेटा सरकारला विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक आणि आर्थिक हस्तक्षेपाची आवश्यकता ओळखण्यास मदत करतात. “हा सर्वेक्षण केवळ औपचारिकता नसून एक राष्ट्रीय जबाबदारी आहे. या माध्यमातून उद्योगाच्या योगदानाचे आणि गुंतवणुकीच्या संधींचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येते,” असे ते म्हणाले. त्यांनी नवोपक्रमासाठी सरकारने अंमलात आणलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला, जसे की ₹1 लाख कोटींचा संशोधन, विकास आणि नवोपक्रम (RDI) निधी, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF), तसेच नॅशनल क्वांटम मिशन, NM-ICPS, आणि एआय मिशन.
डा. विवेक कुमार सिंह, वरिष्ठ सल्लागार, नीती आयोग, भारत सरकार यांनी सांगितले, “भारत आज अशा निर्णायक टप्प्यावर आहे जिथे उद्योग-आधारित संशोधन, विद्यापीठांचा सहभाग आणि सरकारी सुधारणा एकत्र येत आहेत. हेच योग्य वेळ आहे की आपण संशोधनापासून उत्पादनापर्यंत आणि प्रयोगशाळेतून बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासाला वेग देऊ.”
ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय S&T सर्वेक्षण हे केवळ आकडे गोळा करण्याचे काम नाही — ते भारताच्या विज्ञान धोरणासाठी एक साक्ष्याधारित पाया आहे. वेळेवर आणि विश्वसनीय डेटा आपल्याला अधिक प्रभावी कार्यक्रम तयार करण्यास, उद्योगांचा सहभाग वाढविण्यास आणि जागतिक नवोपक्रम निर्देशांकांमध्ये भारताची स्थिती मजबूत करण्यास सक्षम बनवतो.”
डा. अरविंद कुमार, सल्लागार व प्रमुख, एनएसटीएमआयएस, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भारत सरकार यांनी आपल्या सत्रात “रणनीतिक नियोजन आणि संसाधन वितरणासाठी सुदृढ आरअँडडी आकडेवारी उभारणे: आव्हाने आणि पुढील दिशा” या विषयावर भाष्य करताना सांगितले,
“राष्ट्रीय S&T सर्वेक्षण हे केवळ डेटा संकलनाचे कार्य नाही; हे साक्ष्याधारित नियोजन आणि रणनीतिक निर्णय प्रक्रियेचे अधिष्ठान आहे, जे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मजबूत करते. पाच दशकांच्या अनुभवावर आधारित हा सर्वेक्षण भारताच्या वाढत्या नवोपक्रम क्षमतेचे आणि जागतिक ध्येयांचे प्रतीक आहे.”
ते पुढे म्हणाले, “उद्योगाचा सक्रिय सहभाग भारताच्या आरअँडडी क्षेत्राचे संपूर्ण चित्र सादर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. वेळेवर आणि अचूक डेटा आपल्याला प्रगती मोजण्यासाठी, धोरणे तयार करण्यासाठी आणि सर्वसमावेशक वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी सक्षम करतो.”
डा. मुर्तझा खोराकीवाला, वरिष्ठ सदस्य, फिक्की आणि व्यवस्थापकीय संचालक, वॉकहार्ट यांनी म्हटले,”राष्ट्रीय S&T सर्वेक्षण हे फक्त सांख्यिकीय उपक्रम नाही , तर ते राष्ट्रीय आत्मपरीक्षणाचे क्षण आहे. हे आपल्याला विचार करायला लावते की आपण पुरेसे गुंतवणूक करतो आहोत का आणि आपल्या वैज्ञानिक क्षमतेचा समाजहितासाठी पुरेपूर वापर करतो आहोत का.”
ते पुढे म्हणाले, “जर एखादी भारतीय कंपनी जागतिक खर्चाच्या दहाव्या भागात जागतिक दर्जाच्या अँटिबायोटिक्स तयार करू शकते, तर ते आपल्या नवोपक्रम क्षमतेचे जिवंत उदाहरण आहे. आता गरज आहे योग्य परिसंस्थेची, कर सवलतींची, जलद नियामक प्रक्रियांची आणि उद्योग-विद्यापीठ भागीदारीची, ज्यामुळे भारत जागतिक नवोपक्रम महासत्ता बनेल.”
कार्यशाळेच्या समारोपात प्रा. अभय करंदीकर यांनी सांगितले की, “भारताचे डीप-टेक स्टार्टअप्स, सूक्ष्म-मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग यांच्या सहकार्यानेच एक मजबूत नवोपक्रम साखळी निर्माण होऊ शकते. उद्योग आणि अकादमिक क्षेत्राने एकत्रितपणे भारताला जागतिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम नेतृत्वाच्या शिखरावर नेणे गरजेचे आहे.”
कार्यशाळेचा समारोप सर्व आरअँडडी घटकांना राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वेक्षण 2024–25 मध्ये सक्रिय सहभागासाठी आवाहन करत करण्यात आला, ज्यायोगे भारत एक सशक्त, डेटा-आधारित आणि नवोपक्रम-प्रधान अर्थव्यवस्था बनू शकेल.




