प्रा.दीपाली तंबाखे-सोसे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची(पीएच.डी.) आचार्य पदवी जाहीर
प्रा.दीपाली तंबाखे-सोसे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची(पीएच.डी.) आचार्य पदवी जाहीर

अकोला (NHI@24/ ANAGHA SAKPAL 📞 9004379946):- येथील प्रख्यात लेखिका, मराठी भाषेच्या गाढ्या अभ्यासक,शिक्षणतज्ञ,’आनंदी गुरुकुल’ ग्रूप ऑफ एज्युकेशन च्या संस्थापक, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय संशोधन केंद्र वाशिमच्या संशोधक विद्यार्थीनी प्रा.दीपाली तंबाखे- सोसे यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीची आचार्य पदवी (पीएच.डी.) जाहीर झाली आहे. त्यांनी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय संशोधन केंद्र, वाशिमच्या केंद्रप्रमुख तथा विद्यार्थीप्रिय प्रा.डॉ.सुनिता राठोड-गोरे यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळविले आहे.
त्यांनी ‘यवतमाळ जिल्ह्यातील उमेद अभियानात सहभागी असणाऱ्या महिलांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत झालेल्या बदलांचे अध्ययन'(अभ्यास क्षेत्र- यवतमाळ जिल्हा) या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे अभ्यासपूर्ण शोध प्रबंध सादर करून आचार्य पदवी (पीएच.डी.) या उच्च पदवीसाठी पात्र ठरल्या आहेत.
प्रा. दीपाली आतिश सोसे यांनी आजवर एम.ए. (मराठी).,एम.ए.(इतिहास)., एम.एड.,एम.एस.डब्ल्यू., एम.फिल., रंगभूमी आणि अभिनय या विषयांमध्ये पदविका,नाटक आणि रंगमंच यामध्ये पदव्युत्तर पदविका,समुपदेशनामध्ये पदविका प्राप्त करून विविध विषयांवरील ज्ञान संपादन केले आहे. त्यांनी ‘नाट्यशास्त्र’ या पदविकेमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक तर बी.एड. सीईटी या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून नवव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकून बहुमान प्राप्त केला होता. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणलोट विभागात ‘जिल्हा प्रशिक्षण समन्वयक’ म्हणून तसेच महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयात पदव्युत्तर विभागात अध्यापनाचे कार्यही केले आहे.
त्यांनी लिहिलेल्या ‘अभिजात मराठी’ आणि ‘माय मराठी’ या ‘वर्ग नर्सरी ते वर्ग आठवी’पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मागील तीन वर्षांपासून केला गेला आहे. मराठी भाषा प्रचार आणि प्रसार तसेच समाजकार्य या विषयांमध्ये सुद्धा रुची घेत त्यांनी आजवर अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. सध्या त्या सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत.
आजवर त्यांची विविध विषयांवरील एकूण ६५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अकोला जिल्हा तरुणाई मराठी साहित्य संमेलनाचे आणि नागपूर येथील राज्यस्तरीय मनमंथन मराठी साहित्य संमेलनाचे ‘संमेलनाध्यक्ष’ पदही भूषविले आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आतापर्यंत एकूण पंचावन्न प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल त्यांचे शिक्षण,साहित्य, प्रशासकीय,सामाजिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.




